Tuesday 24 April 2018

जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका जाहीर


·        नामनिर्देशन पत्र 7 ते 12 मे दरम्यान दाखल करता येणार
·        27 मे 2018 रोजी मतदान
·        72 जागांसाठी होणार मतदान, आदर्श आचारसंहीतेचे काटेकोर पालन करावे
बुलडाणा, दि. 24 : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमधील माहे जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 39 ग्रामपंचायतींच्या 72 रिक्त पदांकरीता पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये 23 एप्रिल 2018 च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
  आयोगाच्या आदर्श आचार संहीता त्या-त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहीता कालावधीत कुठेही करता येणार नाही.
  निवडणूकीची अधिसूचना 27 एप्रिल 2018 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र 7 मे ते 12 मे 2018 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4.30 वाजेदरम्यान  स्वीकारले जाणार आहे. या निवडणूकीचे मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी 28 मे 2018 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी  कार्यालयाने  कळविले आहे.
*******
बाल विवाह मुक्तीसाठी जनजागृती पर कार्यक्रम
·        जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा उपक्रम
बुलडाणा, दि. 24 : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्यावतीने समाजातील बाल विवाह प्रथा संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि या कलंकापासून समाजाला मुक्त करण्यासाठी नुकतेच देऊळघाट, बुलडाणा येथे जनजागृतीपर कार्यक्रम पार पडले. देऊळघाट येथे अंगणवाडी केंद्रामध्ये आणि बुलडाणा येथे दिपस्तंभ करीअर ॲकेडमीमध्ये सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
  देऊळघाट येथे कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बाल संरक्षण समिती सदस्य व शिक्षकवृंद आदीमध्ये बालविवाहाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी गजानन कुसुंबे व सामाजिक कार्यकर्ता प्रदीप सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. बुलडाणा येथे विद्यार्थ्यांमध्ये या कुप्रथेविषयी जनजागृती करण्यात आली. बाल संरक्षण कक्षाचे कायदा व परिविक्षाधिकारी ॲड गणेश देशमुख, श्री सपकाळ यांनी उद्बोधन केले. या कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद येंडोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले.

No comments:

Post a Comment