Thursday 30 November 2017

news 30.11.2017 dio buldana


ग्रंथालय चळवळ टिकल्याशिवाय नवी पिढी घडणार नाही
                                                    -  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
  * जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन
  •  शतायुशी ग्रंथालयांचा सन्मान
  • दोन दिवसीय ग्रंथोत्सव
       बुलडाणा, दि. 30 :   देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढील देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही.  त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केली. 
    स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होत, तर खासदार प्रतापराव जाधव, जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जि. प. सदस्या श्रीमती ज्योती खेडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सहायक ग्रंथालय संचालक ज. सु. पाटील, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
     ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, ग्रामगीतेचे सामूहिक वाचन केले जात असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  अशा विविध धार्मिक तसेच वैचारीक सामाजिक ग्रंथांचे जतन ग्रंथालय चळवळीने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळ अधिक बळकट होणे गरजेचे आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अशासन स्तरावर ग्रंथालय चळवळ संवर्धनाचे काम केले जात आहे.
   यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले,  आयुष्यात पुस्तकांचे महत्व मोठे असून ग्रंथ हे गुरु समान आहेत. ग्रंथ जिवनाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथालय व वाचन संस्कृती टिकणे महत्वाचे असून त्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.  जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यावेळी म्हणाल्या,  प्रत्येक गावात ग्रंथालयाची गरज आहे. त्यामुळे गावागावात ग्रंथालय उभारली पाहिजेत.
    जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ज्या देशात मोठ - मोठी ग्रंथालये आहे. तो देश समृद्ध समजल्या जातो. सध्या मोबाईल युग आहे. सर्वच बाबी मोबाईलवर पाहिल्या जातात, अगदी पुस्तकही मोबाईलवर वाचली जातात.  परंतु प्रत्यक्ष हातात घेऊन पुस्तक वाचनाचा फायदा अधिक होतो. नवीन पिढी पुस्तकांना विसरली तर भविष्यकाळ कठीण राहिल. त्यामुळे वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
   सुरुवातीला जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव यांनी प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथोत्सवाची माहिती व पार्श्वभूमी विषद केली. वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना शतायु ग्रंथालय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. निशिकांत ढवळे यांनी, तर आभार कि.वा. वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील वाचनालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी, साहित्य व कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  विविध पुस्तक प्रदर्शनी विक्रीच्या स्टॉलचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
******* 





                                                            ग्रंथदिंडीत  थिरकली पावले…
  • ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाचा शुभारंभ
बुलडाणा, दि.30 : उच्च  व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हा ग्रंथोत्सव 2017 ला आज 30 नोव्हेंबर रोजी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत साहित्यप्रेमी जनतेची पाऊले थिरकली.
    नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन ताराबाई शिंदे यांच्या वाड्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांच्याहस्ते पालखीचे पूजन झाल्यानंतर ही ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, हरिभाऊ पल्हाडे यांच्यासह शासनमान्य ग्रंथालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी नागरिक, पुरुष व महिला भजनी मंडळ, शाहिर हरिदास खांडेभराड यांचा संच तसेच एडेड् महाविद्यालय व राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
  ग्रंथदिंडी मुख्य बाजार लाईन, जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेट बॅंक चौक या मार्गे  गर्दे सभागृहात पोहचली. दरम्यान भजनी मंडळांनी विविध भजने, भारुडे सादर केली. पारंपारिक पाऊली आणि फुगडी  कलेचे देखील सादरीकरण करुन नागरिकांचे लक्ष वेधले. फुलांनी सजविलेली पालखी त्यामध्ये भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, ग्रामगीता यासह विविध ग्रंथ ठेऊन ही पालखी खांद्यावर घेत दिंडीत फिरविण्यात आली.  साहित्यप्रेमी, कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते तसेच चोखंदळ वाचकांसाठी ग्रंथोत्सव म्हणजे एक आनंद मेळावाच असतो. स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात 30 नाव्हेंबर व 1 डिसेंबर असे दोन दिवस या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाची सुरुवात 9 वाजता ग्रंथदिंडीने करण्यात आली. या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी विविध स्टॉल देखील लावण्यात आले असून वाचकांची या स्टॉलवर दिवसभर गर्दी पहावयास मिळाली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचा स्टॉलही उभारण्यात आला आहे. या स्टॉलला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
                                                                        ******
शेतीसाठी पाणी देण्याविषयी नियोजन करावे
-       पालकमंत्री
  • पाणी आरक्षण समितीची बैठक
  • खडकपूर्णा प्रकल्पाच्या मृत साठ्यातील पाणी देण्यासाठी कार्यवाही करावी

     बुलडाणा, दि. 30 : यंदाच्या पावसाळ्यात पाऊस समाधानकारक जरी पडला असेल, तरी  जलसाठे ओसंडून वाहतील, असा झालेला नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा  मोठा असून त्यामधून या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी सुकणार नाही. याबाबत काळजी घेवून त्यापद्धतीने पाणी देण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना  पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
  पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, राहूल बोंद्रे,  जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे,  आदी व्यासपीठावर  आदी उपस्थित होते. तसेच बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. सुपेकर, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे उपस्थित होते.
   पालकमंत्री पुढे म्हणाले, खडकपूर्णा प्रकलपातील मृत साठ्यातील पाणी उपयोगात आणल्यास पाणीपुरवठा योजनांवर परिणामाबाबत चाचपणी करावी. तसेच एक पाळी पाणी सिंचनासाठी देता येत असल्यास तात्काळ आठ दिवसात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडावे.    खासदार प्रतापराव जाधव, आमदार राहूल बोंद्रे व शशिकांत खेडेकर यांनी खडकपूर्णा प्रकलपातील होत असलेली पाण्याची चोरी, वीज जोडण्या तोडणे, शेतीला सिंचनासाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी देण्याविषयी मत मांडले. तसेच या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. बैठकीला सिंचन, महसूल, पाणी पुरवठा विभागाचे अधिकार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        ******
दिवठाणा येथील गावकऱ्यांना आवास योजनेतंर्गत घरकुले द्यावी
-       पालकमंत्री पांडुरंग फुंडकर

बुलडाणा, दि. 30 : ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर काही नागरिकांची घरे आहेत. या अतिक्रमीत जागांवर असलेले नागरिक यांना जवळपास जागा देवून त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे. त्यासाठी या जागेवर पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत त्यांना घरकुले देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई घरकूल योजनेमधून घरकुलांचा लाभ द्यावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
    ज्ञानगंगा प्रकल्प बाधीत दिवठाणा गावातील अतिक्रमीत जागेवर घरकुलासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी ओमप्रकाश दुबे आदी उपस्थित होते.
   काळेगांव फाट्यावरील जागेची पाहणी करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, दिवठाणा गावातील  या गावकऱ्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर ज्ञानगंगा प्रकलपाचे काम पूर्ण होईल. त्यामुळे अतिक्रमीत जागेवरील नागरिकांचे पुर्नवसन  करणे आवश्यक आहे. याप्रसंगी पुनर्वसन, लघु पाटबंधारे, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितहोते.
                                                                                    **********
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 30 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील दि. 1 व 2 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दि. 1 डिसेंबर रेाजी सायं 7 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 10 वाजता बुलडाणा शासकीय विश्रामभवन येथे आगमन व मुक्काम, दि. 2 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.50 वाजता शासकीय विश्रामभवन येथून बैठकस्थळी रवाना, सकाळी 8 वाजता शासकीय विश्राम भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीस उपस्थिती, सकाळी 10 वाजता विश्राम भवन येथे विविध लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी राखीव, सकाळी 11 वाजता शासकीय वाहनाने बुलडाणा येथून अकोलाकडे प्रयाण करतील.
                                                            *********
जिल्हाधिकारी कार्यालयात
 4 डिसेंबर रोजी लोकशाही दिन
  बुलडाणा, दि.2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या महिन्याचा सदर लोकशाही दिन सोमवार 4 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तहसील कार्यालयात महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
         जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
   अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित रहावे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधीत नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने स्विकारली जाणार नाहीत. तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.
   तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात प्राधिकाऱ्यां-कडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                                    *********
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत वाढ
बुलडाणा, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2014-15, 2015-16, 2016-17 या तीन वर्षासाठी जिल्हयातील खेळाडू, संघटक, क्रीडा मार्गदर्शक यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करावयाची मुदत दि. 09.12.2017 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच अर्जासोबत 100 प्रमाणपत्रची मर्यादा रदद करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व Attachment upload करण्यास शासनाने परवानगी देण्यातआलेली आहे. तरी या मुदतवाढीची जिल्हयातील सर्व खेळाडू, संघटक, क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घेवूनत्यानुसार पुरस्कारासाठीचे आपले अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
                                                                                    ****

No comments:

Post a Comment