Tuesday 20 September 2016

बातमी 20.9.16

                                                                 





चिखली येथील परिवहन विभागाचे ‍िशबीर 30 जुलै रोजी
 बुलडाणा दि.20 -  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चिखली येथे 26 सप्टेंबर 2016 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र 26 सप्टेंबर 2016 रोजी मराठा क्रांती मोर्चा बुलडाणा येथे असल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव सदर शिबिर आता 30 सप्टेंबर 2016 रोजी होणार आहे, याबाबत सर्व वाहनधारक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
--------------
सोशीत व पिडीत समाजाला न्याय देणारे विचार आवश्यक
- जिल्हाधिकारी
* सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा
 बुलडाणा दि.20 -  समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी विचार पोहोचले पाहिजे. या घटकामध्येच समाजातील  सोशीत व पिडीत वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. अशाप्रकारे या सोशीत व पिडीत घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधला पाहिजे. त्यासाठी प्रशासनात अशा सोशीत व पिडीत समाजाला न्याय देणारे विचार आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज केले.
 समाजाभिमुख व सामाजिक सद्भावना निर्माण करण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे,  सहाय्यक आयुक्त एम.जी वाठ, उपवनसंरक्षक बी.टी भगत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेवाने, शिवाजी महाविद्यालय, अकोल्याचे प्रा. डॉ. एम आर इंगळे व बार्टी पुणे येथील श्री. गव्हाळे उपस्थित होते.
    भ्रष्टाचारमुक्त समाज ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, बधूता व एकात्मतेचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सामान्य माणूस आपल्या कार्यशैलीचा शेवटचा घटक माणून कार्य केले पाहिजे. प्रशासनात आल्यानंतर गरजवंत नागरिकांना आपल्या पदापासून लाभ मिळवून दिला पाहिजे.
  याप्रसंगी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथील डॉ. एम. आर इंगळे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील विचार व मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच ॲड वसंत गव्हाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रशासकीय कार्य या विषयावर विचार मांडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सहायक आयुक्त एम. जी वाठ यांनी केले.
   कार्यक्रमाच्या सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संचलन सतिश बाहेकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात महान अर्थशास्त्रज्ञ व आर्थिक धोरणाचे धुरीण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर प्रा. प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. यांचे व्याख्यान झाले, तर महिलांसाठी समान हक्काचे उद्गाते व कामगारांच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर राजीव शिवअप्पा पांडे, वाशिम यांनी मार्गदर्शन केले. यावेळीही मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*******


मुलींच्‍या जन्‍मदराबाबत जिल्‍हयातील 125 गावे संवेदनशील
बुलडाणा, दि. 20-  जिल्‍हयातील मुलींच्‍या घटत्‍या जन्‍मदराच्‍या चिंताजनक सामाजिक परिस्‍थीतीच्‍या दृष्‍टीने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमातंर्गत सुक्ष्‍म विश्‍लेषण व नियोजन प्रक्रीयेच्‍या माध्‍यमातून जिल्‍हयातील 125 गांवे ही मुलींच्‍या जन्‍मदराबाबत अत्‍यंत संवेदनशील असल्‍याचे निदर्शनास आले असून, या गांवात जन्‍म घेणा-या मुलींच्‍या जन्‍माचे गुणोत्‍तर हे मुलांपेक्षा कमी असल्‍याचे निदर्शनास आले आहे. दरम्‍यान या संवेदनशील गावांमध्‍ये बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य  कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी सांगितले आहे.
    मुलींच्‍या घटत्‍या जन्‍मदाच्‍या अनुषंगाने बुलडाणा हा महाराष्‍ट्रातील संवेदनशिल असलेल्‍या 10 जिल्‍हयामध्‍ये समाविष्‍ट असलेला जिल्‍हा आहे. तर देशातील 100 जिल्‍हयामध्‍ये सुध्‍दा बुलडाणा जिल्‍हयाचा समावेश आहे. जिल्‍हयातील गर्भलिंग निदान करणा-या अपप्रवृत्‍तींना  आळा घालुन मुलींचा जन्‍मदर वाढविण्‍यासाठी आवश्‍यक जाणीव जागृती करणे, त्‍याच प्रमाणे मुलींना शिक्षणाच्‍या नियमीत प्रवाहात कायम ठेवणे, मुलगा-मुलगी असा भेद न करता  समान दर्जा व संधी मुलींना सुध्‍दा उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक आहे. त्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी दिपा मुधोळ यांच्‍या पुढाकारातून विविध उपक्रमांमधून सक्रीय  सहभागातून प्रशासनाच्‍या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान यशस्‍वीरीत्‍या सुरु आहे. त्‍याचप्रमाणे जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष श्रीमती अलका खंडारे व उपाध्‍यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्‍या माध्‍यमातून बुलडाणा जिल्‍हा परिषदेने सुध्‍दा सन 2016 हे वर्ष वरीस लेकीचं म्‍हणून साजरा करण्‍याचे निश्‍चीत केले आहे.
       दरम्‍यान जिल्‍हयातील मुलींच्‍या जन्‍मदरात भरीव वाढ होण्‍याच्‍या दृष्‍टीने करण्‍यात येत असलेल्‍या सुक्ष्‍म नियोजनात  आरोग्‍य विभागाने मागील दोन वर्षाच्‍या केलेल्‍या विविध गांवाच्‍या  विश्‍लेषणात्‍मक अभ्‍यासात सुमारे 125 गांवे ही मुलींच्‍या जन्‍मदराबाबत अति संवेदनशील असल्‍याचे दिसून आले आहे. यामध्‍ये बुलडाणा तालुक्‍यातील 17, चिखली तालुक्‍यातील 39 गांवांचा समावेश्‍ असून, देऊळगांव राजा (22),सिंराजा (24),लोणार (08) ,नांदुरा (15) अशा एकूण 125 गांवांचा समावेश आहे.
       यावर्षी माहे ऑगस्‍ट 2016 पर्यंत झालेल्‍या बालकांच्‍या जन्‍माच्‍या गुणोत्‍तराचा विचार करता नांदुरा तालुक्‍यात हा मुलींचा जन्‍म दर दरहजारी 726 असून, संग्रामपूर व मोताळा तालुक्‍यात अनुक्रमे 836 व 843 असल्‍याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी खंत व्‍यक्‍त केली असून, आरोग्‍य,महिला व बालकल्‍याण तसेच शिक्षण विभागास संवेदनशील गावे व तालुक्‍यामध्‍ये जाणीव जागृती विषयक उपक्रमांची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचे निर्देश दिले आहेत

**********
              अनुदानावरील कृषि अवजारांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
  • लाभार्थ्यांनी संबंधित कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा

     बुलडाणा, दि. 20 :  केंद्र शासनाने 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सन 2014-15 पासून राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. या अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाचा अंतर्भाव केला होता. शासनाने सन 2015-16 पासून केंद्र शासनाने सदर उपअभियानाचा अंतर्भाव कृषि उन्नती योजनेतंर्गत केला आहे. या अभियानात सन 2016-17 मध्ये अनुदानावर कृषि अवजारांचा पुरवठा व भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा-सुविधा पुरविण्यासाठी कृषि अवजारे बँक स्थापना या दोन घटकांच्या कार्यक्रमास केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे.
   सदर अभियानामध्ये लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालयाशी संपर्क साधून विहीत नमुन्यातील मागणी अर्जामध्ये अवजारे/उपकरणांचा प्रस्ताव एमएआयडीसी, अकोला यांचे नावे पूर्ण रक्कमेच्या डी.डी/ आरटीजीएस पोहोच समवेत सादर करावा.
  या अभियानामध्ये पुरवठादार म्हणून महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या. अकोला या संस्थेची राज्य शासनाने निवड केलेली आहे. तथापी योजनेतील सर्व अवजारे/उपकरणांचा पुरवठा एमएआयडीसी अकोला यांचेमार्फतच करण्यात येईल. याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
    लक्षांकानुसार प्राप्त प्रस्तावातील अवजारे/उपकरणांचा पुरवठा आदेश एमएआयडीसी अकोला या संस्थेस दिल्यानंतर सदर अवजारे/उपकरणांचा पुरवठा 15 दिवसांच्या आत केल्या जाणार आहे. त्यानंतर सदर बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प व महिला यांचेसाठी एकूण यंत्र / अवजारांच्या 50 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण यंत्र/ अवजारांच्या किंमतीच्या 40 टक्के किंवा सदर अवजारांच्या उच्चतम मर्यादा यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील. तरी सदर प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2016 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
*****
क्रॉपसॅप प्रकल्पातंर्गत कृषि विभागामार्फत पिक पाहणी

     बुलडाणा, दि. 20 :  कृषि उपविभाग बुलडाणा, चिखली, मोताळा व मलकापूर तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या शेंगा दाणे भरणे तथा परिपक्वतेच्या स्थितीत आहे. तसेच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पिक चांगल्या अवस्थेत आहे. क्रॉपसॅप प्रकल्पातंर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि अधिकारी व किड नियंत्रक यांच्या चमूकडून  पाहणी करण्यात आली. मात्र या पाहणी दरम्यान  सोयाबीन पिकावर ऑगस्अ महिन्यात पावसाने खंड दिल्यामुळे सोयाबीनवरसुद्धा तंबाखूची पाने खाणारी अळी व हिरवी उंट अळीचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणाकरिता तंबाखूची पाने खाणाऱ्या व हिरवी उंट अळीने आर्थिक नुकसानीची पातळी म्हणजे प्रती मीटर ओळीत 4 अळ्या आढळून आल्यास इन्डोक्झार्ब 5 इसी  6 मि.ली किंवा क्लोरानट्रॅनीप्रोल 18.5, एस.सी 3 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, बुलडाणा एस. जी डाबरे यांनी केले आहे.
******
पलसोडा ते बावनबीर फाटा मार्गावरील पोलमुळे बसफेरी बंद
  • मार्गावरील विद्युत पोल हटविल्यास बसफेरी सुरू होणार
  • जळगाव जामोद आगाराचा खुलासा

     बुलडाणा, दि. 20 :  जळगाव जामोद आगाराअंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी ते सोनाळा या मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत बसफेरी चालविण्यात येते. गटशिक्षणाधिकारी यांनी महामंडळाला कळविल्यानुसार दिलेला बस मार्ग पलसोडा- बावनबीर- टुनकी- आलेवाडी- जामोद असा आहे. यामधील पलसोडा ते बावनबीर फाटा  हा 2.4 किलोमीटरचा मार्ग मागील पाच वर्षापासून रस्ता वाहतूकीस बंद योग्य नसल्याने बंद होता. महामंडळामार्फत या मार्गाची मार्ग तपासणीही करण्यात आली होती. तसे संबंधीत सरपंच यांना कळविले. या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले, मात्र महावितरणचा पोल हटविण्यात न आल्यामुळे या मार्गावर मानव विकास मिशनची बसफेरी बंदच आहे.
  याबाबत 8 सप्टेंबर 2016 रोजी महामंडळाने प्रशिक्षण वाहन सोबत घेवून वाहतूक निरीक्षक श्री. साळवे व जळगाव जामोद आगाराचे वाहतुक निरीक्षक वाय. एस वांदे यांनी मार्ग तपासणी केली. त्यानंतर खड्डे बुजविण्यात आले. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट 2016 रोजी सुद्धा या मार्गाची तपासणी महामंडळाने केली आहे. इलेक्ट्रिक पोल हटविल्यास पुन्हा एकदा या मार्गाची तपासणी करण्यात येवून मानव विकास मिशनची बसफेरी सुरू करता येणे शक्य आहे. जेणेकरून विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व प्रवाशांनाही लाभ होईल, असस खुलासा जळगाव जामोद आगाराकडून प्राप्त झाला आहे.
** 
मराठा समाज क्रांती मोर्चादिनी जिल्ह्यात दारूबंदी जाहीर
बुलडाणा, दि. 14 - जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2016 रोजी मराठा समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चाचे कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्वये दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, परवानाकक्ष व बिअरबार अनुज्ञप्ती, एफएल/बीआर-2 अनुज्ञप्ती आदी अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे.
*******

   

No comments:

Post a Comment