आयुष्यमान कार्ड व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम * कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ग्रामपातळीवर नियोजन
बुलढाणा,
दि. २२ (जिमाका): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB-PMJAY)
अंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड आणि वय वंदना कार्ड
ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या मोहिमेच्या
प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली
आरोग्य व पंचायत विभागाची संयुक्त आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्यात २० मे ते ३० जून
२०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना
समन्वयाने काम करत मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील कोणताही
पात्र लाभार्थी या सुविधेपासून वंचित राहणार नाही, याची सक्त काळजी घेण्याच्या सूचना
त्यांनी दिल्या.
ही मोहीम अधिक सुटसुटीत आणि प्रभावी व्हावी यासाठी त्याची
विभागणी दोन टप्प्यांत करण्यात आली आहे. पहिला टप्पा २५
मे ते ४ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत
(PHC) येणाऱ्या ५० टक्के ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिरे होतील. यासोबतच सर्व ५० प्राथमिक
आरोग्य केंद्रे आणि २८२ उपकेंद्र स्तरावर शिबिरांचे आयोजन केले जाईल. तालुका फिल्ड
टीममार्फत दररोज या कामाचे क्षेत्रीय सुपरव्हिजन केले जाईल.
दुसरा टप्पा १०
जून ते २० जून २०२६ या काळात उर्वरित ५० टक्के ग्रामपंचायतींमध्ये शिबिरे घेतली जातील.
तसेच पहिल्या टप्प्यात सुटलेल्या किंवा प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा
(Follow-up) करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर पुन्हा शिबिरे आयोजित
केली जातील.
ग्रामपातळीवर विशेष शिबिरे व दुर्गम
भागासाठी विशेष व्यवस्था : नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय, सीएससी
(CSC) केंद्र, उपकेंद्र, शाळा परिसर आणि अंगणवाडी केंद्रांची निवड शिबिरांसाठी करण्यात
आली आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक आणि स्वस्त धान्य
दुकानदार यांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी लाभार्थ्यांना
वेळेत माहिती देऊन शिबिरात उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करतील. दुर्गम तसेच आदिवासी भागातील नागरिकांसाठी इंटरनेटची अडचण
भासू नये, म्हणून ऑफलाइन eKYC सुविधा तसेच व्ही-सॅट (VSAT) किंवा जिओ हॉटस्पॉट
(JIO Hotspot) द्वारे पर्यायी इंटरनेट व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले आहेत. या भागांना तालुका फिल्ड सुपरव्हिजन टीम प्राधान्याने भेट देणार आहे.
या विशेष शिबिरांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी येताना
सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, आधारशी संलग्न (Link) असलेला मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक
आहे.
ज्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला नसेल,
त्यांनी तो जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन तात्काळ अपडेट करून घ्यावा. जिल्ह्यातील
सर्व पात्र नागरिकांनी या विशेष मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले आयुष्यमान
कार्ड आणि वय वंदना कार्ड ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने
केले आहे.
000000
Comments
Post a Comment