खतांची अनियमितता आढळल्यास कृषी केंद्रांचा परवाना रद्द करणार: परवाना प्राधिकारी संतोष डाबरे यांचा इशारा
बुलढाणा दि.19 (जिमाका): मेहकर
येथील 'अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटर'वर खतांचा काळाबाजार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कृषी विभाग आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परवाना प्राधिकारी संतोष डाबरे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी
केंद्र चालकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.
संतोष
डाबरे यांनी स्पष्ट केले की, "शेतकऱ्यांच्या हक्काच्या आणि शासनाच्या अनुदानित
खतांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही. ई-पॉस
(E-POS) मशीनवरील खतांचा साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळल्यास,
किंवा शेतकऱ्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून बनावट नोंदी केल्याचे समोर आल्यास संबंधित
कृषी केंद्रावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल."
ई-पॉस
मशीनवर दिसणारा खताचा साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यात कोणतीही तफावत राहता कामा
नये. कोणत्याही कृषी केंद्रात परवाना संपलेली (Expiry झालेल्या) खते किंवा कीटकनाशके
आढळून आल्यास ते जप्त करून कडक कारवाई केली जाईल. परवाना नसलेली किंवा लेबल व घटकांमध्ये
फरक असलेली संशयास्पद उत्पादने दुकानात ठेवल्यास थेट विक्री बंदी आणली जाईल. नियमांचे
उल्लंघन करणाऱ्या आणि साठा रजिस्टर अपूर्ण ठेवणाऱ्या केंद्रांचा परवाना कायमचा रद्द
(Cancel) करण्यात येईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे.
"अजंठा
ॲग्रो सर्व्हिसेस'वर झालेली कारवाई ही केवळ सुरुवात असून, यापुढे संपूर्ण जिल्ह्यात
कृषी विभागाच्या भरारी पथकांद्वारे अशीच धडक तपासणी मोहीम राबवली जाईल," असेही
संतोष डाबरे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर सर्व कृषी केंद्र
चालकांनी आपले रेकॉर्ड आणि खत विक्री पारदर्शक ठेवावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात
आले आहे.
00000
Comments
Post a Comment