आयुष्यमान व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिम प्रभावीपणे राबवा; सर्व विभागाने समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन * २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत विशेष मोहीम
बुलढाणा,
दि. 25 (जिमाका): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
(AB-PMJAY) अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड व वय
वंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी युद्धस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत आयुष्यमान कार्डचा लाभ पोहोचावा यासाठी संबंधित सर्व
विभागांनी समन्वयाने काम करून मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन डॉ. प्रविणकुमार
देवरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग व पंचायत
विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा
पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले तसेच
ऑनलाईनव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका अधिकारी उपस्थित
होते.
या
बैठकीत जिल्हाधिकारी यांनी लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी
ग्रामस्तरावर जनजागृती, विशेष शिबिरे आणि विभागीय समन्वय वाढविण्याच्या सूचना देण्यात
आल्या. २० मे ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान
प्रत्येक पात्र नागरिकाला योजनांचा लाभ मिळेल यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने
काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले.
ही
मोहीम अधिक सुटसुटीत आणि प्रभावी व्हावी यासाठी त्याची विभागणी दोन टप्प्यांत करण्यात
आली आहे. पहिला टप्पा २५ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक
आरोग्य केंद्रांतर्गत (PHC) येणाऱ्या ५० टक्के ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिरे होतील.
यासोबतच सर्व ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८२ उपकेंद्र स्तरावर शिबिरांचे आयोजन
केले जाईल. तालुका फिल्ड टीममार्फत दररोज या कामाचे क्षेत्रीय सुपरव्हिजन केले जाईल.
दुसरा टप्पा १० जून ते २० जून २०२६ या
काळात उर्वरित ५० टक्के ग्रामपंचायतींमध्ये शिबिरे घेतली जातील. तसेच पहिल्या टप्प्यात
सुटलेल्या किंवा प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचा पाठपुरावा (Follow-up) करण्यासाठी
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर पुन्हा शिबिरे आयोजित केली जातील.
ग्रामपातळीवर विशेष शिबिरे व दुर्गम भागासाठी
विशेष व्यवस्था : नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कार्यालय, सीएससी (CSC) केंद्र,
उपकेंद्र, शाळा परिसर आणि अंगणवाडी केंद्रांची निवड शिबिरांसाठी करण्यात आली आहे. या
मोहिमेत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांचा
सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी लाभार्थ्यांना वेळेत माहिती
देऊन शिबिरात उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करतील. दुर्गम तसेच आदिवासी भागातील नागरिकांसाठी
इंटरनेटची अडचण भासू नये, म्हणून ऑफलाइन eKYC सुविधा तसेच व्ही-सॅट (VSAT) किंवा जिओ
हॉटस्पॉट (JIO Hotspot) द्वारे पर्यायी इंटरनेट व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या भागांना तालुका फिल्ड सुपरव्हिजन टीम प्राधान्याने
भेट देणार आहे. या विशेष शिबिरांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी येताना सोबत आधार
कार्ड, रेशन कार्ड, आधारशी संलग्न (Link) असलेला मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक आहे, अशी
माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.
ज्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी
जोडलेला नसेल, त्यांनी तो जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन तात्काळ अपडेट करून
घ्यावा. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी
होऊन आपले आयुष्यमान कार्ड आणि वय वंदना कार्ड ई-केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्यावे,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
०००००



Comments
Post a Comment