स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी 5 मे अंतिम मुदत
बुलढाणा, दि. 4 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत
राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने
अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 साठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन
अर्जांमधील त्रुटी पूर्तता करण्यासाठी दि. 05 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित
करण्यात आली आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित
जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक व
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने दि. 06 जानेवारी 2017 रोजी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न
बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते.
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये
यासाठी या योजनेचा विस्तार दि. 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये
तालुकास्तरावर करण्यात आला आहे.
शैक्षणिक सत्र 2025-26 साठी विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
अर्जांची कार्यालयीन तपासणी केल्यानंतर अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने ते Send Back करण्यात आले आहेत.
संबंधित विद्यार्थ्यांना वारंवार सूचना देऊनही काहींनी अद्याप त्रुटींची पूर्तता
केलेली नाही.
अशा विद्यार्थ्यांनी दि. 05 मे 2026 पर्यंत
आवश्यक त्रुटी दूर करून अर्ज पूर्ण करावेत, अन्यथा संबंधित अर्ज कायमस्वरूपी
अपात्र ठरविण्यात येणार आहेत. तसेच अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षी अर्ज करता
येणार नसून ते स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहतील, असा इशारा सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण कार्यालयाने दिला आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाची प्रत
व आवश्यक कागदपत्रे अद्याप कार्यालयात जमा केलेली नाहीत, त्यांनीही दि. 05 मे 2026
पर्यंत संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज
कल्याण, बुलढाणा येथील मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment