ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; नागरिकांनी नोंद घ्यावी
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : माहे
जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाच्या १७ फेब्रुवारी २०२६
रोजीच्या आदेशानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर
कार्यपद्धती व टप्पानिहाय अंतिम दिनांक निश्चित करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने
त्यानुसार प्रक्रिया सुरू केली आहे.
प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम
प्रारूप
टप्प्यात तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचा नकाशा २०
फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंतिम केला जाणार आहे. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्या
संयुक्त स्थळ पाहणीद्वारे २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्चितीची
कार्यवाही होईल.
तहसीलदारांच्या
अध्यक्षतेखालील समिती (गटविकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी सदस्य) ५ मार्च २०२६
पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करेल. समितीमार्फत प्रस्ताव ११ मार्च २०२६ पर्यंत
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
जिल्हाधिकारी
नमुना ‘ब’ ची संक्षिप्त तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या करत १७ मार्च २०२६ पर्यंत प्रस्ताव
राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवतील. आयोगाकडून २३ मार्च २०२६ पर्यंत
मान्यता मिळाल्यानंतर दुरुस्त्या समाविष्ट करून ३० मार्च २०२६ पर्यंत समितीकडून अंतिम
स्वाक्षरी केली जाईल.
हरकती
व सूचना मागविणे : प्रारूप प्रभाग रचनेला ७ एप्रिल २०२६ पर्यंत व्यापक प्रसिद्धी देऊन
हरकती व सूचना मागविण्यात येतील. हरकती सादर करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२६ राहील.
प्राप्त हरकती १६ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवून २१ एप्रिल २०२६ रोजी
सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर २३ एप्रिल २०२६ पर्यंत अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
सादर केला जाईल.
अंतिम
प्रभाग रचना : उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी २८ एप्रिल
२०२६ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर
४ मे २०२६ रोजी नमुना ‘अ’ मध्ये अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाईल.
“माहे
जानेवारी २०२६ ते माहे डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला
आहे. याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी,”
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment