दिव्यांग व वयोवृद्धांना सहाय्यभूत साहित्याचे केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते वितरण; गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा - प्रतापराव जाधव








 

 280 वयोवृद्ध व दिव्यांगांना 26 लाखापेक्षा साहित्य वाटप

 

बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : समाजातील दिव्यांग, वयोवृद्ध तसेच गरजू नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा गरजू नागरिकांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवासंकल्प अभियान’अंतर्गत प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा महिल व बालविकास अधिकारी प्रमोद एंडोले, प्रधानमंत्री दिव्याशा डॉ. गौरव बरोई, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थाचे अध्यक्ष सुरेश छाजेळ, सचिव जयसिंग जयवार आदी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 280 पेक्षा जास्त दिव्यांग व वयोवृद्ध लाभार्थ्यांना 26 लाखाचे विविध सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात आले. हात-पायांच्या हालचालींमध्ये अडचण असणाऱ्या तसेच दैनंदिन कामांसाठी इतरांच्या मदतीची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, कमोड चेअर यांसह विविध सहाय्यक साधनांचा समावेश होता.

 

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, वयोमानानुसार अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक क्षमतेवर मर्यादा येतात. काहींना चालणे, उभे राहणे अथवा स्वावलंबीपणे दैनंदिन कामे करणे कठीण होते. अशा नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी मदत होते. दिव्यांग नागरिकांसाठी आवश्यक साधनांचे वाटप करण्याचे काम वर्षभर सातत्याने सुरू असते.

 

वयोवृद्ध नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचाराचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा. तसेच गावातील आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच संबंधित आरोग्य यंत्रणेमार्फत याबाबतची माहिती घेऊन कार्ड काढून घेण्याचे आवाहन श्री. जाधव यांनी केले. आजारी पडल्यानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी आधीच आवश्यक आरोग्यविषयक कागदपत्रे व योजनांचा लाभ घेऊन ठेवणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम वेगाने सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातूनही आरोग्य सुविधा बळकट करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  वयोवृद्ध आई-वडिलांची काळजी घेणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतारवयात आधाराची आवश्यकता असते. त्यामुळे कुटुंबासह समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर