बुलढाणा जिल्ह्यात १०० दिवसांचे ‘आरोग्य मिशन’; ३० वर्षांवरील नागरिकांची मोफत तपासणी
बुलढाणा जिल्ह्यात १०० दिवसांचे ‘आरोग्य
मिशन’; ३० वर्षांवरील नागरिकांची मोफत तपासणी
‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ अभियानास प्रारंभ
बुलढाणा, दि. २ (जिमाका) :
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन्
सल्ला’ हे विशेष अभियान जिल्ह्यात १
सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत १०० दिवस मिशन मोडवर राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ३० वर्षे व त्यावरील प्रत्येक नागरिकाने या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या
शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.
अभियानांतर्गत
मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची
प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान संशयित आढळणाऱ्या नागरिकांना पुढील
तपासणी व उपचारांसाठी आवश्यकतेनुसार संदर्भित केले जाईल. तपासणीपासून निदान, उपचार
आणि पाठपुराव्यापर्यंतची माहिती डिजिटल प्रणालीवर अद्ययावत करण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी दिली.
घरोघरी
भेटी देऊन नोंदणी: अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका,
एएनएम आणि एमपीडब्ल्यू यांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. दररोज सुमारे
४० ते ४५ घरांना भेटी देऊन तपासणी न झालेल्या ३० वर्षे व त्यावरील नागरिकांची माहिती
संकलित करून नोंदणी केली जाणार आहे. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या
माध्यमातून गावनिहाय पथके तयार करून नागरिकांची प्रत्यक्ष आरोग्य तपासणी करण्यात येणार
आहे.
डिजिटल
पद्धतीने अभियानावर देखरेख: अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या तपासण्या, निदान, उपचार
आणि पाठपुराव्याची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात येणार आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून
अभियानाच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात
३० वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांसाठी १ सप्टेंबर ते १० डिसेंबर २०२६ या कालावधीत
१०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मधुमेह, उच्च
रक्तदाब तसेच तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी
करण्यात येणार आहे. आजारांचे लवकर निदान, त्वरित उपचार, नियमित पाठपुरावा आणि आरोग्य
जनजागृती हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, समुपदेशन,
पुढील तपासणी तसेच आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील
३० वर्षे व त्यावरील प्रत्येक नागरिकाने या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य
केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
0000
Comments
Post a Comment