पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण १००% मोफत; काम गतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 






बुलढाणा, दि. 27 (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जलदगतीने मिळावा, यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी आपला 'ॲग्रीस्टॅक' (AgriStack) क्रमांक सोबत घेऊन जवळच्या महा-ई-सेवा किंवा सीएससी केंद्रांवर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) त्वरित पूर्ण करावे. ही संपूर्ण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी १००% मोफत असून, योजनेचे काम विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी दिले आहेत.

ही पहिली यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तलाठी कार्यालये, विकास सोसायट्या आणि बँकांच्या शाखांमध्ये सर्वांना दिसेल अशी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे या पहिल्या यादीत नाहीत, त्यांनी अजिबात काळजी करू नये, त्यांची नावे पुढील यादीत नक्की येतील, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते व कर्जमाफीची रक्कम तपासून मोफत आधार प्रमाणीकरण करावे. ई-सेवा केंद्र चालकांना शासनाकडून मोबदला मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांना कोणतेही शुल्क देऊ नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच, माहितीत काही चूक वाटल्यास शेतकऱ्यांनी थेट पोर्टलवर तक्रार नोंदवावी, प्रशासकीय समिती ती तत्परतेने सोडवून न्याय देईल.

शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. ज्या गावांमध्ये सध्या एकही आधार प्रमाणीकरण केंद्र नाही, तेथे तातडीने नवीन केंद्रे सुरू करण्याच्या आणि ग्रामपंचायतींमधील बंद असलेली केंद्रे तत्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या मोफत व सोप्या सुविधेचा लाभ घ्यावा, जेणेकरून कर्जमाफीचा मार्ग लवकर मोकळा होईल.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कवळे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, संजय खडसे (सिंदखेड राजा), रवींद्र जोगी (मेहकर), अग्रणी बँक व्यवस्थापक शैलेंद्र सिंह, महा आयटीचे प्रसन्न बोरकर आणि बीडीसीसीचे आर.टी. मस्के प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच, दृक्श्राव्य प्रणालीद्वारे (व्हीसी) जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सहायक निबंधक व तालुका कृषी अधिकारी जोडले गेले होते. प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही योजना यशस्वी करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या