जनता दरबारात तक्रारींचा ऑन-द-स्पॉट निपटारा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईचे निर्देश
बुलढाणा (सिंदखेडराजा), दि. 18 : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून त्या वेळेत निकाली काढाव्यात आणि प्रशासनाने सेवाभावी दृष्टीकोनातून काम करावे, असे निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या तक्रारींचा थेट निपटारा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'जनता दरबार' उपक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमी सिंदखेडराजा येथून झाली. येथील मातोश्री मंगल कार्यालयात पहिला जनता दरबार पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, राजेंद्र पोळ, उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे, तहसीलदार अजित दिवटे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, बळीराम मापारी, माजी आमदार खेडेकर, मायाताई म्हस्के, नगराध्यक्ष सौरभ तायडे, योगेश जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी प्रास्ताविकातून जनता दरबाराची रूपरेषा व प्राप्त तक्रारींची माहिती दिली. त्यानंतर तक्रारदारांच्या उपस्थितीत प्रत्येक तक्रारीवर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश राज्यमंत्री जाधव यांनी दिले.
यावेळी त्यांनी शेतरस्त्यांअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबणार नाहीत याची प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, तक्रारदारांना योग्य मार्गदर्शन करावे आणि प्रत्येक तक्रारीचा वेळेत निपटारा करावा, असे सांगितले.
या जनता दरबारात शेतरस्ते, घरकुल, पाणीपुरवठा, महसूल, पोलीस, महिला व बालविकास, महावितरण, मनरेगा, कृषी आदी विविध विभागांशी संबंधित सुमारे ३०० तक्रारी प्राप्त झाल्या. सर्व तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दाखल झालेल्या तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण झाले की नाही, याचा पाठपुरावा राज्यमंत्री जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
जनता दरबारास गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात अधिकारी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
00000
Comments
Post a Comment