‘माय भारत' पोर्टलवर युवकांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम; मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे; जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे आवाहन
बुलढाणा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यातील
१५ हून अधिक वयोगटातील जास्तीत जास्त युवकांना 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यासाठी आणि
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने
विशेष मोहीम हाती घेतली आहे. १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत माय भारत तीव्र नोंदणी
मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी समन्वय
ठेवून काम करावे आणि नोंदणी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार
देवरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे माय भारत तीव्र नोंदणी
मोहीमेची प्रभावी नियोजन व अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली
आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण, जिल्हा क्रीडा अधिकारी
भक्ती आंब्रे, अग्रीम बँकेचे एलडीएम कौशलेन्द्र कुमार सिंह, शिक्षणाधिकारी माध्यमिक
अनिल आकाळ, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी गजानन लोहटे आदी उपस्थित होते.
या मोहिमेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील शेवटच्या
घटकातील युवकांपर्यंत पोहोचून त्यांना या डिजिटल पोर्टलवर नोंदणीकृत करणे हा आहे. यासाठी
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र
सेना (NCC), स्काऊट्स अँड गाईड्स तसेच स्थानिक युवक मंडळांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती
केली जाणार आहे. 15 ते 29 वयोगटातील प्रत्येक युवकाने या पोर्टलवर आपली नोंदणी पूर्ण
करावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले.
ही मोहीम तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे
पोहोचावी आणि नोंदणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि
महाविद्यालयांमध्ये 'माय भारत नोडल अधिकारी' आणि 'माय भारत अॅम्बेसेडर' यांची नियुक्ती
करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना अधिक सक्षम
करून त्यांना थेट 'माय भारत' पोर्टलशी जोडण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. तसेच
जिल्ह्यात नवीन युवक मंडळांची निर्मिती करून त्या माध्यमातून युवकांचे संघटन अधिक मजबूत
केले जाईल. वार्षिक कृती आराखड्यांतर्गत प्रस्तावित असलेल्या विविध राष्ट्रीय व विभागीय
कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय स्थापित केला
जात आहे. यामध्ये प्रामुख्याने विकसित भारत पदयात्रा, युथ क्लब डेव्हलपमेंट कॅम्पेन,
स्पोर्ट्स मीट, नशा मुक्त भारत अभियान यांसारख्या महत्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश
असून, या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे युवा पिढीमध्ये जनजागृती केली जाणार
आहे, अशी माहिती जिल्हा युवा क्रीडा अधिकारी दिक्षा पोमण यांनी दिली.
00000

Comments
Post a Comment