यशकथा: तालसवाड्यातील महिला उद्योजिकेची भरारी: ‘माउली दुग्ध व्यवसाय’ ठरतोय यशाचा नवा मार्ग

 


 ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर तालुक्यातील तालसवाडा या छोट्याशा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा साकार झाली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेला दुग्ध व्यवसाय आज माउली दुग्ध व्यवसाय या नावाने ओळखला जाऊ लागला असून स्थानिक महिलांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे.

सुमारे १८०० लोकसंख्या असलेल्या तालसवाडा गावात सर्व धर्मीय एकत्र नांदतात. शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी गाय, म्हैस व बकरी पालन हा जोडधंदा म्हणून केला जातो. गावाची साक्षरता जवळपास ९९ टक्के असून सामाजिक एकोपा आणि सहकार्याची भावना येथे ठळकपणे दिसून येते.

याच गावातील सौ. पुष्पा संतोष जंगले (वय ४५), प्रगती महिला बचत गटाच्या सदस्य, यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०१३-१४ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (माविम) अंतर्गत गावात महिला बचत गटांची स्थापना झाली. प्रगती महिला बचत गट हा त्यातील एक सक्रिय गट असून सध्या गावात एकूण १२ गट कार्यरत आहेत.

कोरोना महामारीच्या काळात अनेकांचे रोजगार ठप्प झाले असताना, पुष्पाताईंनी संधी ओळखत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज मिळवून त्यांनी सुरुवातीला दोन गाई खरेदी केल्या. स्वतःच्या दुधासोबतच गावातील इतर शेतकऱ्यांचे दूध गोळा करून त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी विक्री सुरू केली. गावात ७० रुपये प्रति लिटर दराने विकले जाणारे दूध तालुक्यात १५० रुपये दराने विकले जाऊ लागले आणि त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. त्यांच्या मेहनतीमुळे व्यवसाय वेगाने वाढू लागला. रोज सकाळी लवकर उठून गोठा स्वच्छ करणे, दूध काढणे, संकलन करणे आणि विक्रीसाठी पाठवणे हा दिनक्रम त्यांनी सातत्याने पाळला.

सन २०२२ मध्ये पहिले कर्ज फेडल्यानंतर त्यांनी पुन्हा कर्ज घेऊन आणखी चार गाई खरेदी केल्या आणि व्यवसायाचा विस्तार केला. त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत त्यांनी मिल्क कलेक्शन व चिलिंग प्लांटसाठी सुमारे ४.५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. या माध्यमातून त्यांनी स्वतःचे दूध शीतकरण केंद्र सुरू केले.

आज त्या परिसरातील गावांमधून दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करतात आणि दही, तूप, लोणी, खवा यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्री करतात. तसेच इतर तालुक्यांमध्येही दूध विक्री करून त्यांनी आपला व्यवसाय लाखोंच्या घरात पोहोचवला आहे. या यशामागे प्रगती महिला बचत गट, सहयोगिनी तसेच लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे त्या नमूद करतात.

पुष्पाताईंची ही यशोगाथा ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, योग्य मार्गदर्शन, जिद्द आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी