उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन
बुलढाणा (जिमाका), दि.16 : उन्हाच्या
तीव्रतेत वाढ होत असताना उष्माघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे
आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे. उष्माघाताचे गंभीर परिणाम
होऊ शकतात, त्यामुळे वेळेवर योग्य प्रथमोपचार आणि खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले.
उष्माघाताचा
त्रास झाल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. घट्ट कपडे
सैल करून शरीरावर थंड पाण्याच्या ओल्या पट्ट्या ठेवाव्यात. रुग्णाला हवा मिळण्यासाठी
पंख्याचा वापर करावा तसेच पायाखाली उशी ठेवून आरामदायी स्थितीत ठेवावे. व्यक्ती शुद्धीत
असल्यास थंड पाणी हळूहळू द्यावे, मात्र बेशुद्ध असल्यास काहीही खायला किंवा पिण्यास
देऊ नये. उलटी होत असल्यास व्यक्तीला एका बाजूला झोपवणे आवश्यक आहे.
उन्हाच्या
लाटेदरम्यान हलके व पचायला सोपे अन्न, फळे आणि सॅलडचा आहार घ्यावा. पुरेसे पाणी पिणे
अत्यंत गरजेचे आहे. सूती, सैल आणि फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. बाहेर पडताना टोपी,
छत्री, गॉगल यांचा वापर करावा आणि प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी. शक्यतो थंड
पाण्याने आंघोळ करावी व मैदानी कामांदरम्यान वेळोवेळी विश्रांती घ्यावी.
उष्माघातापासून
बचावासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी पाणी पिणे, डोके झाकणे आणि लिंबूपाणी, ओआरएस, आंबा
पन्हे यांसारखी द्रवपदार्थ घेणे फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी बाहेर पडणे, उन्हात दीर्घकाळ
राहणे तसेच तिखट, मसालेदार व जड अन्न सेवन करणे टाळावे. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे
तापमान जास्त वाढलेले असेल, ती बेशुद्ध किंवा गोंधळलेली असेल किंवा श्वास घेण्यास त्रास
होत असेल, तर तात्काळ १०८ किंवा १०२ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधून वैद्यकीय
मदत घ्यावी. उन्हाच्या लाटेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि स्वतःसह
कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment