शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा - ॲड. निलेश हेलोंडे
बुलढाणा,दि. 8 (जिमाका) : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना सुरु आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी दिले.
ते बुधवारी सिंदखेड
राजा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या,
चारा लागवड व अतिवृष्टीमुळे नुकसान व मदतीसंदर्भात आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे
निर्देश दिले.
ॲड. निलेश हेलोंडे
यांनी तालुक्यातील शेती पद्धतीचा आढावा घेतांना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी
शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीकांबरोबर चिया, रेशीम, चारा लागवडीला
प्राधान्य देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. चिया, रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांना
मदत करावी. शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सर्वांनी महत्त्वाची भूमिका घ्यायला पाहिजे.
कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत या तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना
शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत
पोहोचवावी. योजनांची अंमलबजावणी गतीने झाली पाहिजे. तालुक्यात प्रक्रिया उद्योग आणि दुग्ध व्यवसायाला चालना द्यावी, चारा लागवडीचे प्रमाण
वाढवावे, रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करावे. उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्यांना कर्ज
पुरवठा झाला पाहिजे. शाश्वत बाजारपेठ, गोदाम उपलब्ध करुन द्यावे. शेतकऱ्यांच्या बांधावर
प्रयोगशाळा सुरु कराव्यात, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतकरी सक्षम झाला
पाहिजे. ही माझी भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला तहसीलदार
अजित दिवटे, तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर, गटविकास अधिकारी अभिजित बांगर, पोलीस
निरिक्षक अमोल इंगळे, भास्कर घुगे, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी जीवन राठोड आदी
उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment