'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा'चा उत्साहात शुभारंभ; शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली - आमदार संजय गायकवाड
बुलढाणा,
दि. 3 (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे
मारावे लागू नयेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान
शिबिर' नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी
केले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा व योजनांचा लाभ एकाच
ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यात येत असल्याचे
त्यांनी सांगितले.
आराध्या लॉन्स येथे आयोजित छत्रपती शिवाजी
महाराज समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष पूजा गायकवाड,
अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुंभरे
तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.
आमदार गायकवाड म्हणाले, समाधान शिबिरामुळे नागरिकांचा
वेळ, पैसा आणि श्रम वाचत असून विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच
ठिकाणी मिळत आहे. शासनाच्या सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची
प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शहर व परिसर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी
आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून घरकुलाच्या माध्यमातून त्यांना हक्काचे घर दिल्या
जात आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पांदण रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात
आहे. पांदण रस्त्यांमुळे शेतीमालाच्या वाहतुकीला गती मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संभाव्य हवामान बदल आणि अल-निनोच्या पार्श्वभूमीवर
जलनियोजनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी अटल भूजल योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू
असल्याचे सांगितले. तसेच वैनगंगा नदीचे पाणी नळगंगा प्रकल्पात आणून जिल्ह्यातील अधिकाधिक
क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दोन लाख 27
हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार
प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी
केले.
यावेळी आमदार संजय गायकवाड व उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात साहित्य, धनादेश, लाभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात
आले. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने
निराकरण होत असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
0000





Comments
Post a Comment