रक्षाबंधनासाठी भारतीय टपाल विभागाचे ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’; बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांत विशेष राखी लिफाफे उपलब्ध
बुलढाणा,
दि. 3 (जिमाका): रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भाऊ-बहिणीच्या
प्रेमाच्या पवित्र नात्याला अधिक सुरक्षित आणि वेळेत जपण्यासाठी भारतीय टपाल विभागाने
‘वन स्टॉप राखी सोल्युशन’ ही विशेष सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत बुलढाणा विभागातील
सर्व टपाल कार्यालयांमध्ये विशेष जलरोधक (वॉटरप्रूफ) राखी लिफाफे उपलब्ध करून देण्यात
आले आहेत.
हे विशेष राखी लिफाफे केवळ १२ रुपये प्रति लिफाफा या माफक
दरात उपलब्ध असून, ते तीन आकर्षक डिझाईन्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्याचा
विचार करून या लिफाफ्यांची जलरोधक रचना करण्यात आली असून, त्यामुळे राखी सुरक्षितपणे
गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांमध्येही हे
लिफाफे उपलब्ध असून, त्यासोबत स्पीड पोस्ट सुविधेचाही लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
याशिवाय, सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल,
पार्सल बुकिंग तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा अशा सर्व सुविधा एकाच
ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात किंवा परदेशात राहणाऱ्या भावंडांना
राखी, भेटवस्तू, मिठाई आणि इतर वस्तू सुरक्षित व वेळेत पाठविणे अधिक सुलभ झाले आहे.
रक्षाबंधनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर राख्या पाठविल्या जात असल्याने शेवटच्या क्षणी
होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी राखी शक्य तितक्या लवकर पोस्ट करावी, असे आवाहन
टपाल विभागाने केले आहे.
बुलढाणा विभाग अधीक्षक डाकघर गजेंद्र एन. जाधव यांनी नागरिकांना
भारतीय टपाल विभागाच्या विश्वासार्ह, सुरक्षित आणि किफायतशीर सेवांचा लाभ घेण्याचे
आवाहन केले असून, विशेष राखी लिफाफे, स्पीड पोस्ट व पार्सल सेवेमुळे देश-विदेशातील
प्रियजनांपर्यंत प्रेमाचे बंध सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचविणे अधिक सोपे झाल्याचे
त्यांनी सांगितले.
00000
Comments
Post a Comment