माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कॉपी मुक्त अभियान; मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कॉपी मुक्त अभियान;

मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि.5: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेमार्फत इयत्ता बारावीची परिक्षा दि. 11 फेब्रुवारी तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारीपासून सूरु होत आहे. जिल्ह्यात परीक्षाचे संचालन योग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात 'कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत असून मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर केले आहे. या सूचनाचे पालन करण्याचे आवाहन दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले  आहे.  

> मार्गदर्शक सूचना याप्रमाणे : परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परीसरातील कॉम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरु होण्यापूर्वी दोन तास आधी पासुन परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा उपलब्ध असून चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खातरजमा करावी. कॉपी मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांस भेट देण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 16 परिरक्षक केंद्र आहेत. सर्व परिरक्षक केंद्रावर सी.सी.टी.व्ही. कार्यन्वित आहे. तसेच परिरक्षक केंद्रावरून पेपर घेतल्याची वेळ व पेपर जमा करण्याची वेळ याबाबत सी.सी.टी.व्ही. द्वारे नजर ठेवण्याचे सूचित केले आहे. परिरक्षक केंद्रावरून पेपर घेऊन जाणे आणि जमा करण्यासाठी ज्या संस्थेचे किंवा शाळेचे परीक्षा केंद्र आहे. त्या शाळेच्या संस्था प्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रसंचालक यांच्या मार्फत नियुक्त असलेला रनर शिक्षक यांनी चारचाकी वाहनाचा वापर करण्यासाठी आदेशित केले आहे. कॉपीमुक्त मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आठ भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

इयत्ता बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये 116 परीक्षा केंद्र असून परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 34 हजार 635 आहे. तसेच इयत्ता दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 159 परीक्षा केंद्र असून परीक्षार्थी संख्या 40 हजार 194 आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाची बैठे पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथक परीक्षा सुरु होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका परिरक्षण केंद्रावर उपस्थित राहील. परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाह्य पद्धतीने मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर परीक्षा केंद्रावर होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.  

परीक्षा कॉपीमुक्त व शातंतापूर्ण वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. परीक्षेत गैरप्रकारांना वाव मिळाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊन शैक्षणिक दर्जा खालाऊ शकतो. त्यामुळे भावी पिढी सक्षम होणार नाही आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी व टिकविण्यासाठी सदर परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, तणावमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी परीक्षा संबधित अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या