बाल विवाह मुक्तीरथ’द्वारे जनजागृती Ø जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी

 




बुलढाणा, (जिमाका) दि. 23 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि अस्मिता फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह मुक्त भारत अभियान मुक्तीरथाला आज जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

बाल विवाह मुक्त भारत अभियान हे भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती व कृती अभियान आहे. याचा मुख्य उद्देश 18 वर्षांखालील मुलींचे व 21 वर्षांखालील मुलांचे विवाह पूर्णतः थांबवणे हा आहे.

 

अभियानाच्या माध्यमातून बाल विवाहाची सामाजिक रूढी संपवणे, मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे, बालकांचे आरोग्य व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि समाजात जनजागृती वाढवणे हे प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड, अनिल गोडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि वरिष्ठ अधिकारी यांनी स्वाक्षरी करुन बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला.

00000

Comments